जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय, नाशिक व विपला फौंऊडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने १०० दिवसीय बाल विवाह प्रतिबंध संकल्प अभियान जनजागृती करण्यासाठी वाडीव्हरे येथील माध्यमिक विद्यालय येथे विद्यार्थ्यांसोबत कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी चाईल्ड हेल्प लाईनच्या प्रकल्प समन्वयक प्रणिता तपकिरे यांनी विद्यार्थ्यांना चाईल्ड हेल्प लाईन १०९८ टोल फ्री नंबर, सुरक्षित व असुरक्षित स्पर्श आणि बालकांच्या हक्कांबाबत माहिती दिली. तसेच विपला फौंऊडेशनचे प्रकल्प व्यवस्थापक नितीन वानखडे यांनी बालविवाह बद्दलची माहिती विद्यार्थ्यांना दिली. कार्यक्रमाच्या शेवटी बाल विवाह न करण्याबाबत प्रतिज्ञा म्हणून घेण्यात आली. त्यानंतर संपूर्ण गावामध्ये बाल विवाह विरोधात जनजागृतीसाठी मशाल रॅली आयोजित करण्यात आली. रॅलीत प्रमुखपणे बाल विवाहाच्या दुष्परिणामांविषयी सतर्कता निर्माण केली गेली व सर्वांना बाल विवाह कधीही स्वीकारार्ह नाही हे सांगितले गेले. “बाल विवाह ही बालकांच्या शारीरिक, मानसिक व सामाजिक विकासात अडथळा आणणारी कुप्रथा आहे. आपल्या गावामध्ये बाल विवाह पूर्णपणे निर्मूल होऊन बालकांना सुरक्षित व सशक्त वातावरण मिळावे ही गरज आहे.” रॅलीमध्ये अंगणवाडी कर्मचाऱ्यांपासून ते शिक्षकपर्यंत व ग्रामस्थांपर्यंत सर्वांनी सहभागी होऊन बाल विवाह प्रतिबंधासाठी आपली भूमिका बजावली. रॅली दरम्यान जागरूकता साहित्य वाटप करण्यात आले व सहभागी लोकांनी बाल विवाह प्रतिबंध प्रतिज्ञा केली. आणखी असेही सांगितले गेले की बाल विवाह प्रतिबंधासाठी गावात नियमितपणे कार्यक्रम चालू राहतील व बालकांच्या सर्वांगीण विकासासाठी ग्रामपंचायत सक्रिय राहील.
सदरील कार्यक्रमाप्रसंगी पोलीस निरीक्षक श्री. भगवान मथुरे, वाडीवऱ्हे गावचे ग्राम पंचायत अधिकारी श्री. किशोर दळवे, पोलीस उपनिरीक्षक एकनाथ भोयर, एकात्मिक बाल विकास सेवा योजनेच्या पर्यवेक्षिका श्रीमती कुलट, शाळेतील मुख्यध्यापक व शिक्षक, सामाजिक कार्यकर्ता तुषार सूर्यवंशी, गीतांजली पवार, गावातील अंगणवाडीसेविका आणि स्थानिक ग्रामस्थ यांची उपस्थिती होती.



